‘शिवबसव विचार : राष्ट्राची गरज’ यावर शनिवारी विचारमंथन

Shivbasav vichar Solapur karykram
वर्ष नवे, संदेश नवा : हिंदवी परिवार व वीरशैव व्हीजनचा उपक्रम
Video -
सोलापूर : हिंदवी परिवार व वीरशैव व्हीजन या दोन सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने "शिवबसव विचार : राष्ट्राची गरज" या विषयावर विचारमंथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती हिंदवी परिवारचे संस्थापक डॉ. शिवरत्न शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बेळगाव आणि बंगळुरू येथे घडलेल्या निंदनीय घटनेबाबत महाराष्ट्र व कर्नाटकातील जनतेला यापुढील काळात एक सकारात्मक संदेश देण्यासाठी या विचार मंथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास समाजातील मान्यवर उपस्थित राहून आपण आपले विचार व्यक्त करणार आहेत.
महापुरुषांना....मग ते कोणत्याही जातीधर्माचे असोत, त्यांना जातीधर्माच्या चौकटीत बंदिस्त करू नये व वर्तमानातील कोणत्याही वादात अडकवू नये.
कोणत्याही देशात, राज्यात, जातीधर्मात काही विकृत, हुल्लडबाज, अविचारी असतात. त्यांना जनमाणसांचा पाठिंबाही नसतो. परंतु त्यांनी केलेले निंदनीय कार्य काही काळ तणाव निर्माण करते. अशा प्रवृत्तींना कायद्याने कठोर शिक्षा केलीच पाहिजे.
त्याचबरोबर समाजातील बुद्धीजीवींनी प्रबोधनाच्या माध्यामातून राष्ट्रऐक्याचा सकारात्मक संदेश दिला पाहिजे यांकरिता हिंदवी परिवार व वीरशैव व्हिजनने या शिवबसव विचार मंथनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
1 जानेवारीला नवीन वर्षात राष्ट्रनिर्माणाचा नवा संकल्प करण्यासाठी सायंकाळी 5.30 वाजता जागरूक नागरिकांनी शिवस्मारक सभागृहात सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेस हिंदवी परिवाराचे राज्य उपाध्यक्ष तथा नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, वीरशैव व्हीजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, कार्याध्यक्ष सहकार्याध्यक्ष राजेश नीला, अभिजीत भडंगे, बसवराज जमखंडी उपस्थित होते.