ShivSena Nominates Jyoti Waghmare for RajyaSabha
सोलापूर : शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) आगामी राज्यसभेसाठी आपला आक्रमक चेहरा आणि दलित समाजातील अभ्यासू नेतृत्व प्रा. ज्योती वाघमारे यांना संधी दिली आहे. गुरुवारी त्यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली असून, या निर्णयामुळे सोलापूरकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
राहुल शेवाळे, कीर्तिकरांच्या नावांना मागे टाकत संधी
बुधवारपर्यंत शिवसेनेकडून राहुल शेवाळे आणि गजानन कीर्तिकर यांच्या नावांची चर्चा रंगली होती. मात्र, गुरुवारी अनपेक्षितपणे प्रा. ज्योती वाघमारे यांचे नाव पुढे आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुभवी नेत्यांऐवजी ग्राऊंड झिरोवर काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्याला संधी देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
संघर्षातून राज्यसभेचा प्रवास
प्रा. ज्योती वाघमारे यांचा प्रवास अत्यंत संघर्षाचा राहिला आहे. त्यांचे वडील बांधकाम कामगार होते, तर आई चादरीच्या कारखान्यात काम करायची. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला त्यांनी प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये काम केले. सोलापूर शहर काँग्रेस महिला अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. २०२३ मध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर अल्पावधीतच त्या पक्षाचा आक्रमक चेहरा बनल्या.

पक्षाची बाजू लावून धरली; मुख्यमंत्र्यांकडून कार्याची दखल
शिवसेनेच्या मुख्य प्रवक्तेपदाची धुरा सांभाळताना ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि विरोधकांना सडेतोड उत्तरे दिली. २०२४ ची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी राज्यभर प्रचारसभा गाजवल्या. त्यांच्या या कार्याची दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना थेट ‘संसदेच्या वरच्या सभागृहात’ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
बाळासाहेबांच्या काळातील ‘आक्रमक महिला आघाडी’ची आठवण
एकेकाळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेची महिला आघाडी आपल्या आक्रमकतेसाठी ओळखली जात असे. तोच वारसा पुढे चालवत एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य घरातील महिलेला सत्तेत वाटा देऊन जुन्या शिवसेनेची आठवण करून दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
प्रा. ज्योती वाघमारे यांचा हा प्रवास केवळ राजकीय नसून तो अत्यंत अष्टपैलू आहे. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमं आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.
सोलापूरची स्थानिक वृत्तवाहिनी ‘दिनमान’ मध्ये त्यांनी वृत्तनिवेदिका म्हणून अत्यंत प्रभावी काम केले. केवळ वृत्त निवेदिका म्हणून न थांबता सोलापुरातील अनेक मोठ्या स्थानिक कार्यक्रमांमध्ये ‘निवेदिका’ म्हणून त्यांनी आपली छाप सोडली. व्यासपीठावर उभे राहून जनसमुदायाला आपलेसे करण्याची कला त्यांनी याच काळात आत्मसात केली.
पत्रकारिता आणि निवेदनाच्या या अनुभवामुळेच, आज शिवसेनेच्या मुख्य प्रवक्त्या म्हणून त्या कोणत्याही विषयावर अत्यंत अभ्यासू आणि आक्रमकपणे आपली बाजू मांडू शकतात. एका निवेदिकेचा हा प्रवास आता थेट देशाच्या सर्वोच्च सभागृहात म्हणजेच राज्यसभेत पोहोचत आहे.











