सोलापूरकरांना उन्हाच्या चटक्यांपासून दिलासा;
वाहतूक सिग्नलच्या वेळेत मोठा बदल
सोलापूर : शहरात वाढत्या उन्हाचा पारा ३८ अंशांच्या पार गेल्याने वाहनचालक आणि सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, तापत्या उन्हाचा त्रास वाहनचालकांना होऊ नये यासाठी सोलापूर शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशाने वाहतूक सिग्नलच्या वेळेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक) सुधीर खिरडकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

काय आहेत नवीन वेळा?
दुपारच्या कडाक्याच्या उन्हात सिग्नलवर थांबावे लागू नये, यासाठी दुपारी काही काळ सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सकाळची वेळ: सकाळी ०९:०० ते ११:०० वाजेपर्यंत.
संध्याकाळची वेळ: दुपारी ०४:०० ते रात्री ०९:०० वाजेपर्यंत.
यापूर्वीची वेळ काय होती?
याआधी हे सिग्नल सकाळी ०९:०० ते दुपारी ०२:०० आणि दुपारी ०४:०० ते रात्री ०९:०० या वेळेत सुरू असायचे. आता दुपारी ११:०० ते ०४:०० या अत्यंत उष्णतेच्या काळात सिग्नलच्या वेळेत कपात करून वाहनचालकांना दिलासा देण्यात आला आहे.
वाहनचालकांसाठी पोलीस प्रशासनाचे आवाहन
वाढत्या उष्म्याचा विचार करता वाहतूक पोलिसांनी नागरिकांच्या आरोग्यासाठी काही मार्गदर्शक सूचनाही केल्या आहेत:
१. पेहराव: वाहन चालवताना शक्यतो पांढरे सुती कपडे वापरावेत आणि डोक्यावर टोपी परिधान करावी.
२. पार्किंग: आपली वाहने रस्त्यास किंवा रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही अशा सुरक्षित आणि सावलीच्या ठिकाणी पार्क करावीत.
३. आरोग्य: उन्हापासून वाचण्यासाठी स्वतःची काळजी घ्यावी आणि आवश्यक असेल तरच दुपारी घराबाहेर पडावे.
सोलापूर शहर वाहतूक शाखेने घेतलेल्या या निर्णयाचे वाहनचालकांकडून स्वागत होत आहे.











