MLA Devendra Kothe reaction on the Union Budget
सोलापूर: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा खऱ्या अर्थाने ‘विकसित भारताची’ पायाभरणी करणारा आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारा आहे, अशी प्रतिक्रिया शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केली आहे. या अर्थसंकल्पातील विविध तरतुदींमुळे सोलापूरच्या प्रगतीला मोठी गती मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कनेक्टिव्हिटी आणि आयटी क्षेत्राचा कायापालट
आमदार कोठे म्हणाले की, अर्थसंकल्पात प्रस्तावित असलेला मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर सोलापूरसाठी गेमचेंजर ठरणार आहे. सोलापूरमध्ये सध्या आयटी पार्कची उभारणी होत आहे. अशा वेळी केंद्र सरकारने दिलेली ही वेगवान कनेक्टिव्हिटी सोलापूरच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी ‘बूस्टर डोस’ ठरेल. यामुळे सोलापूर, पुणे आणि हैदराबाद ही शहरे एकमेकांशी जोडली जाऊन व्यापारात मोठी वाढ होईल.
वस्त्रोद्योग आणि छोट्या उद्योजकांना बळ
सोलापूरची ओळख असलेल्या वस्त्रोद्योगाच्या पाठीशी केंद्र सरकार खंबीरपणे उभे असल्याचे या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले आहे.
– हँडलूम, खादी आणि हातमाग व्यवसायासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत.
– यामुळे स्थानिक विणकर आणि छोट्या उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिक्षण आणि महिला सक्षमीकरणावर भर
शिक्षण क्षेत्राबाबत बोलताना कोठे यांनी सांगितले की, “विद्यार्थिनींसाठी वसतीगृह बांधण्याचा निर्णय हा त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला मोठी चालना देणारा आहे. तसेच, परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना करात सवलत जाहीर करून केंद्र सरकारने युवकांच्या स्वप्नांना बळ दिले आहे.”
सर्वसामान्यांना दिलासा
कोणतीही नवीन करवाढ नसलेला हा अर्थसंकल्प मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्यांचे हित जोपासणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने सोलापूरच्या प्रगतीत सिंहाचा वाटा उचलला असून, हा अर्थसंकल्प जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणारा ठरेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.










