सहा जणांचे मृतदेह सापडले! तीन वर्षांच्या चिमुकलीचा समावेश
इंदापूर / सोलापूर : उजनी धरणात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील सहा जणांचे मृतदेह आज सकाळी सापडले आहेत.
गुरुवारी सकाळी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) जवान शोधकार्याला सुरुवात करण्यासाठी उजनी धरणाच्या (Ujani Dam) परिसरात दाखल झाले. यावेळी तीन जणांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. यानंतर एनडीआरएफचे (NDRF) जवान हे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले आहेत. हे मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्यांची ओळख पटवली. त्यानंतर काहीवेळातच एनडीआरएफच्या पथकाला चौथा मृतदेह सापडला. चार मृतदेहांमध्ये दोन पुरुष, एक महिला, एक लहान मुलाचा सामावेश आहे.
या दुर्घटनेत बुडालेल्या प्रवाशांची नावे समोर आली आहेत. गोकुळ दत्तात्रय जाधव (वय 30), कोमल दत्तात्रय जाधव (वय 25) शुभम गोकुळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकुळ जाधव (वय 3) (सर्व रा.झरे ता.करमाळा), अनुराग अवघडे (वय 35) गौरव धनंजय डोंगरे (वय 16 दोघे रा.कुगाव ता.करमाळा) अशी पाण्यात बुडालेल्या सहा जणांची नावे आहेत.
मंगळवारी सायंकाळी सोलापूर जिल्ह्यातील कुगाव येथून पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील काळाशी येथे जाण्यासाठी हे प्रवासी बोटीने निघाले होते. त्यावेळी वादळी वारे वाहू लागल्याने बोट उलटी झाली. यावेळी बोटीवर सात प्रवासी होते. यापैकी एकजण पोहत बाहेर आला होता. त्यामुळे या दुर्घटनेची समोर आली. त्यानंतर उर्वरित सहा जणांचा शोध सुरु होता. मात्र, शोधकार्याच्या संथगतीमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला होता.
माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उजनी परिसरात भेट देऊन पाहणी केली होती. तपास कार्य लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.